बदनापूर
उच्च शिक्षित असूनही शासकीय नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून २५ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना बदनापूर येथे घडली. राणी साहेबराव नाईकवाडे असे मृत तरुणीचे नाव आहे. राणी ही विज्ञान शाखेची पदवीधर होती. तिने काही स्पर्धा परीक्षा दिल्या होत्या. आरक्षण नसल्याने शासकीय नोकरी मिळत नाही. या विवंचनेत तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती मुलीचे नातेवाईक व सरपंच सोपान नाईकवाडे यांनी दिली आहे.
पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने पुणे येथे एका खासगी कंपनीत जॉब मिळविला होता. ती कंपनीत नोकरीही करीत होती. दरम्यान, राणी ही काही दिवसांपूर्वी पुणे येथून बदनापूरला आई-वडिलांकडे आली होती. यातच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. मृत तरूणीच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. शासनाने मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा, आरक्षण नसल्याने यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नोकऱ्या मिळत नसल्याने समाजातील उच्चशिक्षित तरुण, तरुणी टोकाचे पाऊल उचलत आहे. यामुळे आरक्षणाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, अशी मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप ताडगे यांनी केली.
